महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांला जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांला जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

..मराठी पाऊल पडते पुढे, जगभरातील उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

एकमेकांला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू

कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिली. अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संवादाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

या संवादात उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आमी परिवाराचे संयोजक संतोष करंडे (अमेरिका), ज्येष्ठ विचारवंत संदीप देसले (इजिप्त), अलअदिल ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख, उद्योजक डॉ. धनंजय दातार(दुबई), उत्कर्ष बल्लाळ (ओमान), विशाल गायकवाड (रियाध), संजय पाटील (कतार), लेफ्टनंट कर्नल सचिन टिळेकर (ऑस्ट्रेलिया), तेजस्विनी डोळस (अबुधाबी), मृदुला जोशी (कॅनडा), धवल नांदेडकर (फुजैराह), प्रीती पाटील (युनायटेड किंगडम), प्रज्ञा आगवणे (शारजाह), ज्योती नेने-त्रिवेदी (केनिया), मोहम्मद नदीम (सऊदी अरेबिया), डॉ.अनघा कुलकर्णी (बहारीन), सुशांत सावर्डेकर (दोहा), उल्का नागरकर (शिकागो) सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातून जय महाराष्ट्र ऐकू येतो आहे, हा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जगभरातून आपण शुभेच्छा देत आहात. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहे, हा अनोखा अनुभव आहे. आपण मायभूमीपासून दूर गेलात, पण तुमची पाळेमुळं इथचं आहेत. मनाने इथेच आहात, याचा आनंद आहे. जगभरातील मराठी माणूस महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे येतो आहे, हे आशा पल्लवित करणारे आहे. मराठी माणूस जगातील विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदापर्यंत पोहचला आहे. आपल्या कौशल्याने त्या-त्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लावतो आहे. तुम्ही आता जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, त्याची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. विदेशात भविष्याची चाहूल लवकर लागते. त्यादृष्टीने पावले उचलली जातात. त्या अनुषंगाने आपला त्या-त्या क्षेत्रातील अनुभव- अभ्यास महाराष्ट्रालाही उपयुक्त ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी गत दीडवर्षातील महाराष्ट्रातील कोविडशी झूंज, वादळ आणि अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पूराचा फटका यांचा उल्लेख करून, या आव्हानांवर मात करून महाराष्ट्र पुढे जात असल्याचे सांगितले.उद्योजक डॉ. दातार यांच्यासह या संवादात सहभागींनी कोरोना संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत मुख्यमंत्री.ठाकरे यांनी उत्कृष्ट काम केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

या संवादाच्या दरम्यानच केनियातून ज्योती नेने-त्रिवेदी यांनी त्यांचे वडील डॉ.नेने यांचे बार्शी (जि. सोलापूर) येथील नर्गीस दत्त कॅन्सर रिसर्च रुग्णालयामध्ये सोयी-सुविधांमध्ये वाढ करून, हे रुग्णालय ग्रामीण जनतेच्या सेवेत रुजू करण्याबाबत विनंती केली. याबाबत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी लगेचच या रुग्णालयाबाबत आढावा घेण्याचे निर्देश दिले. तसेच लवकरात लवकर हे रुग्णालय पुन्हा नव्या दमाने रुजू करण्यात येईल, असा विश्वास दिला.

शारजाहातून मिलिंद विनोद यांनी एक शाळा दत्तक घेऊन ती अद्ययावत तंत्रज्ज्ञानाने आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी करण्याची तयारी दर्शविली. मुंबई महापालिकेकडून दादर येथील एका मार्गाला ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले आणि आभारही मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *