कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवून आयुष औषध प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली

कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात सामान्य जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आयुष औषध प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे : राष्ट्रपती कोविंद.

कोविड-19 संसर्गाविरुद्धाच्या लढ्यात, विशेषतः महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत, आयुष औषध योजनेने लोकांची प्रतिकारशक्ती वाढवून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विश्वविद्यालयाची कोनशीला बसविण्याच्या कार्यक्रमात ते आज  बोलत होते.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, देशात प्राचीन काळापासून आरोग्य सुविधा आणि औषधपचाराच्या अनेक पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धती प्रचलित आहेत. केंद्र सरकारने या पद्धतींच्या विकासासाठी अखंडीत प्रयत्न केले आहेत. या औषधोपचार पद्धतींचे पद्धतशीर शिक्षण आणि संशोधन केले जावे  यासाठी 2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने देखील 2017 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना केली याकडे त्यांनी निर्देश केला. महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विश्वविद्यालयाच्या स्थापनेमुळे  या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या राज्यातील इतर आयुष वैद्यकीय संस्था त्यांच्या क्षेत्रात अधिक उत्तम काम करु शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाले की आज संपूर्ण जगात एकात्मिक औषध योजनेच्या संकल्पनेला मान्यता मिळत आहे. लोकांना रोगमुक्त करण्यासाठी विविध वैद्यकीय उपचारपद्धती एकमेकींना पूरक म्हणून कार्य करीत आहेत. औषधी वनस्पती आणि झाडांच्या मागणीत सतत वाढ होत आहे आणि त्यामुळे शेतकरी तसेच जंगल निवासींचे उत्पन्न वाढत आहे तसेच अधिक रोजगार निर्मिती देखील होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *