मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे.

मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .

मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक; मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी केल्या महत्त्वपूर्ण सूचना .

साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे. जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी असे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

साकीनाका येथील घटनेबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत त्याठिकाणी पोहोचून जखमी महिलेस राजावाडी रुग्णालयात दाखल केले आणि कुठेही वेळ दवडला नाही तसेच तातडीने संशयितास पकडले याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी तसेच पोलिस करीत असलेल्या तपासाविषयी जाणून घेतले व एकूणच चौकशीवर समाधान व्यक्त केले.

१ महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा

मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे तसेच न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरु करावे असेही निर्देश दिले.

जलदगती न्यायालयात खटला चालवणार

हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल असे पाहून पीडित दुर्दैवी महिलेस न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई हे देशातील एक सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. लोकांचा पोलिसांवर आणि कायदा व सुव्यवस्था यावर विश्वास आहे. मात्र अशा घटनेमुळे आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना पोलिसांना केल्या , त्या पुढीलप्रमाणे –

महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.

महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी.

प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.

स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.

गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *