Central government working on clockwork to repatriate Indians stranded in Ukraine
युक्रेनमधे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्रसरकार घड्याळ्याच्या काट्यावर काम करत आहे
नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमधे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्रसरकार घड्याळ्याच्या काट्यावर काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
युद्धसदृश स्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधे ज्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे, त्याविषयी आपल्या सरकारला जाणीव आहे, असं ते म्हणाले. प्रत्येक भारतीय घरी परत येईल यासाठी केंद्रसरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अनेक ठिकाणी हवामानाच्या प्रतिकूल स्थितीमुळे गोष्टी अवघड होत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आपण अनेक देशांच्या प्रमुखांशी व्यक्तीश: बोललो असून, या मोहिमेत गुंतलेली सगळी मंत्रालयं पूर्ण निष्ठेनं काम करत आहेत, असं ते म्हणाले. चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या सीमेवर असलेल्या देशात विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी गेले असल्यामुळे त्यांना दिलासा मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं.
युद्धापूर्वी भारत आणि युक्रेन यांच्यातल्या विमान उड्डाणांवर निर्बंध होते. आता मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्यामुळे उड्डाणांची संख्या वाढवता येणार आहे. आतापर्यंत सुमारे १२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी परत आणल्याची माहिती त्यांनी दिली.